मुंबई, दि. २८ (पीसीबी) – सिंचन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या कोणत्याही तपास यंत्रणेवर सरकारचा दबाव नाही. एसीबीने कारवाई केली आहे. ते चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आहेत. निवडणुका किंवा अधिवेशन डोळ्यासमोर ठेऊन कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. अजून अनेक प्रकरणे बाहेर यायची आहेत, अनेक नावे समोर येणार आहेत. जे दोषी आढळले आहेत, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले.
सरकार सूडबुद्धीने नाही तर नियमाने कारवाई करत आहे,” असं उत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपांना दिलं आहे. सिंचन घोटाळ्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवारच जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपीठात सादर केले आहे. यावर सरकार राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देताना सरकार सूडबुध्दीने नाही, तर नियमाने कारवाई करत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंचन घोटाळ्याप्रकरणी कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विरोधक गेल्या चार वर्षांपासून विचारत आहेत. इतकी वर्ष फक्त चौकशीच का सुरु आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला प्रश्न केला होता. यावर याचा अर्थ अजित पवारांना चौकशीशिवाय तुरूंगामध्ये टाकावे, अशी त्यांची इच्छा आहे का? असा प्रतिसवाल गिरीश महाजन यांनी केला.