पंचवीस दिवसानंतर पिंपरीतील साखळी उपोषण स्थगित

0
168

पिंपरी, दि. १ (पीसीबी)- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून पासून महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आरक्षण देण्याचे मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र सरकार जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत.
सरकारने 24 डिसेंबर पर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण करतो असे आश्वासन दिले होते. परंतु ते सुद्धा आश्वासन महाराष्ट्र सरकार पूर्ण करू शकले नाही. सदरचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे यासाठी महाराष्ट्रभर मराठा समाज विविध ठिकाणी साखळी उपोषण करत होता. याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवडच्या वतीने गेल्या पंचवीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. सदरचे उपोषण रविवार दिनांक 31 रोजी सायंकाळी पाच वाजता स्थगित करण्यात आले. शहरातील मराठा समाजाच्या उपस्थितीत गेल्या पंचवीस दिवसापासून साखळी उपोषणास बसलेले सतीश काळे, वैभव जाधव,मीराताई कदम, संतोष शिंदे,रावसाहेब गंगाधरे, लहू लांडगे,दिलीप गावडे, वसंतराव पाटील,यांनी यावेळी उपोषण मागे घेतले‌.
यावेळी प्रकाश जाधव मारुती भापकर अशोक सातपुते मोहन जगताप,कल्पना गिड्डे, सुनिता शिंदे, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
येथे 20 जानेवारी पर्यंत सरकारने मराठा समाजास सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. मुंबई येथील आंदोलनास पिंपरी चिंचवड शहरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असा संकल्प सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
सदरच्या आंदोलनाच्या तयारीसाठी शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण स्थगित केले आहे असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले.