मंचर, दि. २६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपसह शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी हल्ला चढवला. यावर पवार यांनी ठाकरे यांना उत्तर दिले आहे. माझ्यावर मैदान सोडण्याची टीका करण्यापेक्षा एकदा तरी मैदानात या, असे आव्हान शरद पवार यांनी ठाकरे यांना दिले आहे.
शिरूर लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा मंचर येथे झाली. यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका १४ वेळा लढविल्या आहेत. या निवडणुकीत एकदाही पराभव झालेला नाही. पुढच्या वर्षी मला ८०वे वर्ष लागेल. त्यामुळे पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे आणि आपण थांबले पाहिजे. मात्र, ते सांगतात की मी मैदान सोडले. त्यांना एवढीच विनंती आहे की, एकदा तरी मैदानात या, असे पवार यांनी ठाकरे यांना आव्हान दिले .
मैदानातून पळून जाण्याच्या गोष्टी ठाकरेंनी आम्हाला सांगू नयेत. ज्यांनी कधीही आयुष्यात मैदान बघितले नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. मैदान बघायचे असेल तर जरूर या. तेथे माझी गरजही भासणार नाही. ती कुस्ती आमचा बारका पैलवानही करील, असे पवार म्हणाले.