हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा – डॉ. अमोल कोल्हे

0
41
  • विरोधी उमेदवारला डॉ. कोल्हेंचे थेट जाहीर आव्हान

मंचर : विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, राजू इनामदार, आलू इनामदार, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे आदी उपस्थित होते.

या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत आपला पोरकट बालिशपणा दाखवून दिला. या बालिशपणाचा डॉ. कोल्हे यांनी खरमरती समाचार घेतला.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला. त्यावरुन हे गद्दार आहेत हे माहिती होत हे इतके भेकड आहेत हे माहीत नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, असं थेट जाहीर आव्हान विरोधकांना दिल.

कोविड काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांच खरचं हसू येत, असं सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या 105 रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता.

घर कोणाचं, संसार कोणाचा आणि दारावर पाटी कोणाची?

डॉ. कोल्हे यांच्या पदयात्रे दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याच उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत, जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत? बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवल होत?


समोरच्या उमेदवारच डमी उमेदवार

माध्यमांमध्ये बातमी वाचली, समोरचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे. मला फार खंत वाटली असं सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांकडून निधी आणला, म्हणून जे टिमकी वाजवत होते, त्या मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं, अशी बातमी माध्यमांनी दाखवली. मला वाटलं होतं समोरचा उमेदवार हा चॉईसने आलेला उमेदवार असेल, पण हा आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार आहे, अशी बातमी समोर आली.

मी वैयक्तिक टिकेवर गेलो नाही, याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा नाही

तेव्हा की ठरवलं होतं याविषयी बोलायचं नाही, पण राजकीय सुसंस्कृतपण अपेक्षित असताना, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असं ठरवलं होतं. आणि अजूनही ते कसोशीने जपलं आहे. पण अश्या पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय होत नाही. पुरावे माझ्याकडे ही आहेत.