उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवावी ; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

238

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने असे अतिक्रमणे काढण्यात यावेत. उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम उभारण्यात यावी, अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. दरम्यान, आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ७४ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, ८, ६, ८, ७, ८, १८ आणि ५ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.   क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे  सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. या सभांमध्ये स्थापत्य, जलनि:स्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन आदी विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी, नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,  रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे रहदारीस अडथळा होत असून संबंधितांना दंड आकारल्यास अशाप्रकारे राडारोडा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, कचरा संकलन केंद्राजवळ दुर्गंधी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी. धोकादायक असलेले पथदिवे काढून नव्याने पथदिवे उभारावेत तसेच पथदिव्यांचे काम  लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना वजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.