परमात्म्याच्या प्राप्तीसाठी शरीर, वाणी, मनाचे तप हवे – सदगुरु शिवकुमार महास्वामीजी

0
193

पिंपरी,दि. १ (पीसीबी) – परमात्म्याच्या प्राप्तीसाठी शरीर, वाणी मनाचे तप गरजेचे आहे. मात्र आज रेडीमेडचा जमाना असल्याने तपाची बुद्धी नाही .बुद्धीविना परमात्मा भेटू शकत नाही असे प्रतिपादन प.पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांनी येथे केले.

दि. २८ जानेवारीपासून एक फेब्रुवारी पर्यंत भोसरी येथे प.पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी, बिदर यांचा अध्यात्मिक सोहळा गुरुदर्शन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे मंगळवारी प्रवचनापूर्वी सायंकाळी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

यानंतर “नाम वाचे उच्चारिता हरे संसार व्यथा ” या विषयावर प. पू. सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांचे प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, बुद्धी विना परमात्मा भेटत नाही. जी बाब सत्य -असत्य निर्णय करू शकते त्याला बुद्धी म्हणतो. मात्र शिक्षण घेतल्याने बुद्धी मिळतेच असे नाही. पदवी मिळाली म्हणजे कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे हे कळतेच असे नाही. शिक्षण घेतलेला माणूस जनावरासारखा वागत असेल तर त्याला बुद्धिमान कसे म्हणावे ? कुठे जेवावे काय जेवावे हे ज्याला कळत नाही त्याला बुद्धिमान कसे म्हणावे? असा सवाल सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी सद्गुरु शिवकुमार महास्वामीजी म्हणाले की, प्रत्येक देशात वेगळे नियम आहेत. त्या त्या देशात कोणाची सत्ता येते त्यानुसार त्या पक्षानुसार वेगवेगळे नियम लावले जातात. बनवले जातात तसेच प्रत्येक युगात परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे नियम केले गेले. मात्र परमात्म्याच्या प्राप्तीसाठी शरीर, वाणी व मनाचे तप गरजेचे आहे.

मूर्ख माणसाला ते शक्य नाही असे सदगुरू शिवकुमार महास्वामीजी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री सदगुरू सिद्धारूढ अध्यात्मिक समिती, पुणेचे परमपूज्य शंकरानंद स्वामीजी संस्थापक तसेच अध्यक्ष अमरनाथ माना, सचिव रमेश गंताले, रमेश कोहल्ली, शिवपुत्र संतपुरे, सूर्यकांत मुरुड, रवींद्र चांगलेरा, अण्णासाहेब बिरादार, चंद्रशेखर गाणगेर, वीरेंद्र काळे, संतोष बिरादार, भक्ती धनुरे यांनी केले.