Odisha Train Accident । रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच सूचना दिली होती…

0
258

देश,दि.०५(पीसीबी) – ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघातात झाला. यात 288 प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला तर 1 हजारपेक्षा जास्त प्रवाशी हे जखमी झाले आहेत. हा अपघात का झाला याचे कारण रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला. या यंत्रणेत फेरफार केल्यानंतर घातपात केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. तसेच या अपघातास चालक किंवा सिग्नल यंत्रणा कारणीभूत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या यंत्रणेतील त्रुटीविषयीची कल्पना काही दिवासांपूर्वी पत्राद्वारे दक्षिण रेल्वेमधील अधिकाऱ्याने रेल्वे व्यवस्थापकाला कळवली होती. मात्र या इशाऱ्याकडे रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वर्षाच्या सुरुवातीला “प्रणालीतील गंभीर त्रुटींबद्दल” चिंता व्यक्त केली होती. दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापकाने यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात “सिस्टीममधील गंभीर त्रुटींबद्दल” चिंता व्यक्त केली होती. यात अधिकाऱ्याने एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सिग्नल बिघाड झाल्याचे ठळकपणे सांगितले होते.

अधिकाऱ्याने यंत्रणेच्या बिघाडाविषयी लिहिलेल्या पत्रात एका घटनेची माहिती दिली आहे. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सुमारे 17.45 वाजता एक अतिशय गंभीर घटना घडली होती. ज्यामध्ये अप ट्रेन क्रमांक: 12649 संपर्क क्रांती एक्स्प्रेस, रोड1 वरून, पेपर लाइन क्लिअर तिकीट (PLCT) सह सुरू झाली. कारण अ‍ॅडव्हान्स स्टार्टर बीपीएसी (ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर) नादुरुस्त झाले होते. दरम्यान हे स्टार्टर 17.45 तासांनी व्यवस्थीत काम करू लागले होते. 12649 संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या लोको-पायलटला काहीतरी गडबडीचा संशय आला त्याने पॉइंट क्रमांक: 65 A च्या आधी ट्रेन थांबवली. रेल्वे पॉइंट डाउन मेन लाइनवर म्हणजेच चुकीच्या रेल्वे रुळावर गेली होती. PLCT नुसार ही रेल्वे अप मेन लाइनवरून गेली पाहिजे होती.

सिग्नलवर रेल्वे जेव्हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले जाते, तेव्हा मार्गावर अलर्ट पाठवला जातो. हा अलर्ट हा एसएमएस पॅनलवर योग्य मार्गावर रेल्वे असल्याचे दाखवले जाते. हे इंटरलॉकिगच्या कामाच्या विरोधात आहे. यात सुधारणा करण्याची सुचनाही या अधिकाऱ्याने दिली होती. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) प्रदेशातील रेल्वे स्थानकांच्या सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी जबाबदार व्यक्तींविरुद्ध आवश्यक कारवाई करावी. यात तत्काळ सुधारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची शिफारसही या अधिकाऱ्याने केली. या यंत्रणेची तपासणी झाल्यानंतर यात काही सुधारणा झाली का? याची माहिती देण्यात यावी. तसेच ही सिस्टीम सुधारणे बाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती द्यावी. यंत्रणेत काही बिघाड झाल्यास आवश्यक कृती काय करावी, यासाठी स्टेशन मास्टर्स, TI आणि वाहतूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही अधिकाऱ्याने आपल्या पत्रात सांगितले होते.

सिग्नल मेंटेनन्स सिस्टिमबाबतही संबंधित अधिकाऱ्याने ताकीद दिली की, त्यावर तातडीने देखरेख आणि दुरुस्ती न केल्यास आणखी अपघात होऊ शकतात. सिग्नल मेंटेनरकडून योग्य प्रक्रिया का पाळल्या जात नाहीत, असा प्रश्न अधिकाऱ्याने आपल्या पत्रात केला होता. नॉन-इंटरलॉक्ड कामांमध्ये नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले होते.

दरम्यान ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस तसेच मालगाडीचा या अपघातात समावेश आहे. एक रेल्वे रुळावरु घसरल्यामुळे दुसऱ्या रेल्वेच्या डब्ब्यांवर आदळली. ज्यामुळे किमान 2 88 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 हजार 100 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा चौकशी अहवाल येणे बाकी आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये झालेल्या बदलामुळे हा अपघात झाला. याला घटनेला जबाबदार व्यक्ती कोण असल्याचे शोधण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.