२०२२ मध्ये  भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल; पंतप्रधान मोदींचा विश्वास

825

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारताला स्वातंत्र्य मिळून २०२२ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. त्यादृष्टीने वैज्ञानिकांची तयारी सुरू असून इस्रोमध्ये वेगाने काम सुरू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) येथे केले. सर्व देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारतात राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे आज देशातील लाखो बालके निरोगी आयुष्य जगत आहेत. या मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. महात्मा गांधींनी  तयार केलेल्या सत्याग्रहींनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले आहे. आज महात्मा गांधींच्या प्रेरणेतून आम्ही स्वच्छाग्रही तयार केले आहेत. हे स्वच्छाग्रहीच देशाला स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मोदी यांनी  व्यक्त केला.

यावर्षी २५ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान देशाला सर्मपित केली जाणार आहे. यामुळे गरीब व्यक्तीलाही चांगली आणि परवडणारी आरोग्य सेवा या माध्यमातून मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आरोग्य क्षेत्रातील सरकारच्या या अभियानाचा देशातील ५० कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील प्रामाणिक करदात्यांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे, असेही मोदी म्हणाले.