कोल्हे जरा विकासावर बोला – शिवाजीराव आढळराव पाटील

0
39

निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला. त्यांनी कितीही टीका करू द्या, पण मी काम करण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आळंदीतील संवाद मेळाव्यात आढळराव बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, मनसेचे नेते बाबू वागस्कर, प्रकाश कुऱ्हाडे, किरण येळवंडे, राहुल चव्हाण, अजय तापकीर, योगेश रंधवे या वेळी उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी ज्यांना निवडून दिले, ते डॉ. कोल्हे अडीअडचणींना कधी धावून येत होते का? अडचणीच्या वेळेस धावून येणे, दोन गोड शब्द बोलणे एवढीच लोकांची अपेक्षा असते. तीसुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. विकास तर दूरच राहिला. पंधरा वर्षांत मी गावा-गावांमध्ये निधी पोहोचविला. मागील वेळी माझा पराभव झाला. परंतु, हार मानली नाही. उलट ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी लढत राहिलो. विविध योजना, प्रकल्प राबविण्याचा माझा मानस आहे. कोणाच्याही भावनेला बळी पडू नका, आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन, समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले आहे हे लक्षात ठेऊन मतदान करण्याचे आवाहन आढळराव-पाटील यांनी केले.

मोहिते म्हणाले, की आळंदीकरांनी दरवेळी आढळरावांना मताधिक्य दिले आहे. त्यांना खासदार करण्यामागे आळंदीकरांचा मोठा हात आहे. या भागातून रेल्वे जाणार असल्यामुळे आळंदीचे महत्त्व वाढणार आहे. चाकण, आळंदीची महापालिका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आळंदीतील पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे आपण गेले पाहिजे.