हा भूकंप देखील पचविण्याची शिवसैनिकांमध्ये ताकद – सचिन अहिर

0
271

आकुर्डी, दि. २७ (पीसीबी) – शिवसेनेच्या बंडखोर मंत्री, आमदारांना वारंवार मुंबईत या, बोलू चर्चा करु, त्यासाठी 24, 48 तासांची मुदत दिली. तुम्ही या, बोला, त्यांना वारंवार निमंत्रण दिले, ते आमच्या जीवाभावाचे लोक आहेत. पण, दुर्दैवाने त्यांच्याकडूनच वेळ निघून गेली. बंडखोरांनी त्यांची दारे त्यांनीच बंद केली. त्यामुळे पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. हा भूकंप देखील पचविण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये असल्याचे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. पण, आजही उद्धवजींच्या हाकेला साथ देऊन आले. तर, त्यांना घेऊ असेही ते म्हणाले.

आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना अहिर म्हणाले, शिवसेनेला केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीची नोटीस आली आहे. यातून स्पष्ट , दबावतंत्र वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. राऊत यांना थांबविण्यासाठी चौकशीला बोलविले आहे. पण, राऊत लोकांसमोर सत्यता, वस्तुतिथी मांडण्याचे काम चालूच ठेवतील. विधानसभा उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांनी गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. उपाध्यक्षांची नोटीस खारीज करण्याची बंडखोरांची मागणी आहे. पण, उपाध्यक्षांच्या अधिकारीत सर्वोच्च न्यायालयही हस्तक्षेप करु शकत नाही. करणार नाही. न्यायालयात पाठिंबा काढला असे सांगितले म्हणजे पाठिंबा काढला असे होत नाही. त्यात न्यायालय दखल घेईल असे वाटत नाही.

बंडखोरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. रोड टेस्ट म्हणजे बंडखोरांना हे पाऊल कशासाठी उचलले याचा लोकांना जवाब द्यावा लागेल. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगत आहेत. आमचाच गट अधिकृत आहे. मग, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानत नाहीत का, ते तरी जाहीर करावे. ते सांगतात उद्धवजींच्या विरोधात नाही. महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत. मग, सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागेल. मग, कोणत्या गटात आहेत, कोणत्या पक्षात विलीन झालो आहेत हे सांगावे लागेल. रोड टेस्टचा अर्थ मारा, बघून घेऊन असा होत नाही. रोड टेस्ट म्हणजे लोकांना सामोरे जाऊन फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागेल.

कालपर्यंत आम्ही विलीन होणार नाही असे सांगत होते. कायदा सांगतो विलिन झाल्याशिवाय पर्याय नाही. काही लोक अजूनही मनापासून तिकडे नाहीत. त्यामुळे रोड टेस्ट महत्वाची आहे. बंडखोरी केलेले बहुतांश आमदार मतदारसंघात जातील. तेव्हा लोक त्यांना जाब विचारतील. त्यावेळी ते परत शिवसेनेत येतील, त्यांना यावे लागेल. परत आले नाही तर पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. शिंदेसोबतचे बंडखोर लोक कालपर्यंत आम्ही स्वतंत्र गट नाहीत असे सांगत होते. आम्हीच शिवसेना गट आहोत, असे सांगत होते. आम्हाला गटाची काय गरज आहे. गट स्थापन करत असताना बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यातच विसंगती आहे. त्यांना कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल. अगोदर प्रहारमध्ये विलिन होणार अशी चर्चा होती. आता मनसेत विलीन होणार अशी चर्चा आहे. दोनवेळा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहेत. गट स्थापन केल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही. मतदारांसमोर जातील, त्यावेळी काय उत्तरे देतील. पण, मला वाटत नाही मनसेबोत जातील, असेही अहिर म्हणाले.