कोल्हापूर , दि. २३ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माढ्यात बुधवारी (दि.२७) एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गुरूवारी (दि.२८) पुण्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाआघाडीच्या ऑफरमुळे खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या मेळाव्यात स्वाभिमानी आपला उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. याबाबत कोल्हापुरामध्ये रात्री १२ वाजता सुरु झालेली बैठक पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू आहे. या बैठकीत स्वबळावर लढण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
महाआघाडीने स्वाभिमानीला हातकणंगले या एकाच जागेची ऑफर दिली होती. परंतु राजू शेट्टी तीन जागांसाठी आग्रही आहेत. यामध्ये वर्धा आणि बुलडाण्याच्या जागेचा समावेश आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकूण ९ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. यात हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या जागांचा समावेश आहे.