स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट

0
213

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल (ICCC) ला शहरातील एएसएम आयबीएमआर कॉलेज, जेएसपीएम महाविद्यालय, एमयूसीसी कॉलेज यासह अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील 270 हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.

आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिककेंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले या सर्वांचा समावेश आहे. तसेच या पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टीकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, 5 जी पर्यंतची कनेक्टीव्हिटी बँडविड्थ आणि लॉंग टर्म इव्होल्युशन नेटवर्क यांचा समावेश असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

प्रकल्प प्रतिनिधी सुजीत वानखेडे, चंद्रकांत देशपांडे, नवनीत तिवारी यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाविषयी माहिती दिली. कमांड आणि कंट्रोल सेंटर हे आपत्तींचे व्यवस्थापन, विसंगत परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी आणि शहरातील विविध ऑपरेशन साठीचे केंद्र मानले जाते. इंटीग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या सहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट महानगरपालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी स्मार्ट सिटी संबंधित घटकांशी संपर्क स्थापित करणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे शक्य होते. हे सर्व मिळून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना अस्तित्वात येते. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाते.

डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाचे लाईव्ह स्टेटस समजण्यात मदत देखील होते. याचबरोबर, ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या शोधणे व त्यांची निराकरण, माहितीचे रिअल टाईम विश्लेषण आणि भविष्यवेधी बौद्धिक कौशल्य, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थेपर्यंत सुलभतेने पोहोचता येते. योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण आणि देखरेख, सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणी द्वारे नागरिकांच्या वर्तनामध्ये बदल, शहराचा आत्मनिर्भर आणि बहुआयामी विकास करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसंगी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनची 25 जून 2022 रोजी 7 वर्षे साजरी करण्यासाठी ‘सबका भारत, निखरता भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमच्या वतीने अभ्यास दौ-याचे संयोजन करण्यात आले होते.