संपात पिंपरी चिंचवड मधील 20 हजार तर पुणे येथील 80 हजार रिक्षा चालकांचा सहभाग – बाबा कांबळे

0
207

– रिक्षा बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्‍के प्रतिसाद

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी संपात सहभाग घेऊन आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. शहरात रिक्षा बंदला शंभर टक्‍के प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने पिंपरी ते पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत रॅली काढली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे शहराध्यक्ष सोमनाथ कलाटे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब ढवळे, रवींद्र लंके, सुरेश सोनवणे, दिनेश तापकीर, तुषार लोंढे, निलेश लंके, अविनाश जोगदंड, हिरामण गवारे आदीसह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या सुरूवातीला पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अधिकारी अतुल आदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरू असूनही जोपर्यंत मागण्या मान्य होते नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, लोकशाही व शांततेच्या मार्ग सुरू ठेवावे असे आव्हान देखिल बाबा कांबळे यांनी केले.

रॅपीडो बाईक बंद होईपर्यंत बेमुदत आंदोलन – बाबा कांबळे

खाजगी कंपन्यांचा प्रवासी वाहतूकीमध्ये सहभाग वाढल्याने रिक्षा, टॅक्‍सी चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यात भरीस भर म्हणून रॅपीडो बाईक प्रवासी वाहतूक करत आहेत. या बाबत वारंवार तक्रार करूनही आरटीओ कार्यालय, शासनाचे अधिकारी व नेतेमंडळी दखल घेत नाहीत. त्यामुळे रॅपीडो बाईक पुर्ण बंद होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.