श्री दत्तजयंती विशेष। ‘श्री दत्त’ जन्म नेमका कसा व का झाला….

0
739

आपण दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्त जयंती साजरी करतो. पण या मागे काही अध्यात्मिक घटना आणि कथा आहेत..

श्री दत्त हे महर्षी अत्री आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत. देवी अनुसूया यांचे नाव पतिव्रत धर्मासाठी अग्रणी घेतले जाते. त्यामुळे दत्त जन्माविषयी पुराणात एक कथा आहे ती अशी कि, ‘देवी लक्ष्मी, देवी पार्वती आणि देवी सरस्वती यांना आपल्या पतिव्रत धर्माचा गर्व झाला होता. मात्र परमेश्वराला कधीही आपल्या भक्ताचे अभिमान सहन होत नाही म्हणून त्यांनी एक लीला रचण्याचा विचार केला.परमेश्वरांनी देवर्षि नारदांच्या मनात एक गोष्ट निर्माण केली. जेव्हा नारद देवलोकात गेले आणि तिन्ही देवींना जाऊन म्हणाले कि, अत्रीपत्नी अनुसूया यांच्या समोर आपले सतीत्व नगण्य आहे. अत्रीपत्नी अनुसूया या खूप मोठ्या पतीभक्त आणि पतिव्रता आहेत. जेव्हा तिन्ही देवींनी हे ऐकलं तेव्हा तिन्ही देवींनी आपल्या पतिदेवांना म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्यांना देवर्षि नारद काय म्हणाले ते सार काही सांगितलं. आणि अनुसूयाच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यास भूलोकावर जाण्यास सांगितल. तिन्ही देवांनी त्यांना खूप समजावले पण तिन्ही देवींच्या हट्टीपणा समोर देवांचे काहीही चालले नाही. शेवटी ते तिघेही साधुवेष घेऊन त्यांच्या आश्रमात गेले. त्यावेळी महर्षी अत्री आश्रमात नव्हते. पाहुणे घरी आलेले बघून देवी अनुसूयेने त्यांना नमस्कार करून अर्घ्य, कंदमूळ अर्पण केले पण ते म्हणाले की, ‘आम्ही तो पर्यंत अन्नाला ग्रहण करणार नाही जो पर्यंत आपण आम्हाला आपल्या मांडीवर घेऊन भरवत नाही.’

साधूंचे ते बोलणे ऐकून त्या संभ्रमात पडल्या. मात्र देवी अनुसुयांना अतिथी धर्म निभवायचा होतो. म्हणून त्यांनी नारायणाचे आणि आपल्या पतीचे स्मरण केले, त्यांना मनोमन नमस्कार केला. आणि या सगळ्या प्रकाराला भगवंतांची इच्छा मानून त्या म्हणाल्या की, ‘जर माझे पतिव्रत धर्म खरे असेल तर हे तिन्ही अतिथी सहा-सहा महिन्याचे बाळ होतील.’ त्यांनी असे म्हणताच, ते तिन्ही देव सहा-सहा महिन्याचे बाळ झाले आणि रडू लागले. तेव्हा अनुसूया मातेने त्यांना आपल्या मांडीवर घेऊन दूध पाजले आणि पाळण्यात घातलेपण इकडे स्वर्गलोकामधे तिन्ही देवी आपल्या पतींची वाट पाहत होत्या. बराच वेळ उलटून सुद्धा तिन्हीदेव देव लोकात परतले नाही म्हणून तिन्ही देवी खूप विचलित झाल्या. शेवटी नारदमुनींनी त्यांना येऊन घडलेले सर्व काही सांगितले. तेव्हा तिन्ही देवी लगोलग देवी अनुसूया कडे आल्या आणि घडलेल्या प्रकाराची सर्व हकीकत सांगितली आणि देवी अनुसूया यांची क्षमा मागितली. देवी अनुसुयाने आपल्या पतिव्रत धर्मामुळे तिन्ही देवांना त्यांच्या रूपात परत आणले. तेव्हा प्रसन्न होऊन तिन्ही देवांनी त्यांना मनाजोगा वर मागण्यास सांगितले. तर त्या म्हणाल्या कि, ‘आपण तिन्ही देव मला माझ्या मुलांच्या रूपात प्राप्त व्हावे.’ आणि देवांनी ‘तथास्तु’ म्हणून त्यांना वर दिला आणि आपल्या देवलोकात निघून गेले.

काही कालावधी नंतर हे तिन्हीदेवांनी देवी अनुसूया यांच्या पोटी जन्म घेतला. देव ब्रह्माच्या अंशातून चंद्र, देव शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि देव विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय जन्मले. म्हणजेच श्री दत्त हे श्री विष्णू भगवान यांचे अवतार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या जन्माची तिथी श्री दत्त जयंतीच्या नावाने ओळखली आहे.