शाहू महाराजाना पाडण्यासाठी १०० कोटी घेऊन मुख्यमंत्री हॉटेलात बसले होते …

0
46

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करतानाच अनेक आरोपही केले आहेत. चोरलेल्या धनुष्याला विजयी करण्यासाठी शिंदे गट पैसे वाटप करत आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी नकली शिवसेना राबत आहे. मुख्यमंत्री 100 कोटी घेऊन कोल्हापुरातील एका हॉटेलात बसलेत. तोही लुटीचाच माल आहे. महापालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नाही. हे आमदारांना 50-50 कोटी देत आहेत. खासदारांना 100-100 कोटी देत आहेत, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

ठाण्यातील सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. आनंद दिघे यांची संपत्ती किती आहे, असा सवाल मला उद्धव ठाकरे यांनी केला होता, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही दिघे साहेबांच्या इस्टेटीची चौकशी केली, असं त्यांचं म्हणणं आहे. दिघे साहेबांची इस्टेट असून असून काय असणार? त्यांची एकमेव इस्टेट आनंद आश्रम. शिंदेंनी ही इस्टेट हडप केली. आपल्या सर्वांचं मातोश्री आहे. तसं ठाण्यात आनंद आश्रम आहे. ते त्यांनी स्वत:च्या नावावर करून घेतलं. इतकी लफंगेगिरी करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेबांचा वारसदार होऊ शकतो?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

नासके आंबे वर्षावर गेले
उद्धव ठाकरेंना मी ओळखतो, त्यांनी त्यांना विचारलं असेल कदाचित, काय हो शिंदे… दिघ्यांची इस्टेटबिस्टेट तुम्ही परस्पर हडप तर केली नाही ना? हे त्यांना विचारलं असण्याची दाट शक्यता मला वाटते. दिघे साहेबांच्या नावावर ज्यांची प्रॉपर्टी वाढली असे ठाण्यातले नासके आंबे वर्षावर गेले असले तरी 4 जूनला यांचा निकाल लागणार आहे. नरेंद्र मोदीच जाणार तर हे कसे राहणार. काय केलं या 10 वर्षात मोदींनी. या देशासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा सवाल राऊत यांनी केला.

कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन
नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये सत्तेत आले. तेव्हा गॅस 400 रुपयाला होता. आज 1200 रुपयाला आहे. हे मोदींचं कर्तृत्व आहे. आणि ते देशाचा विकास करायला निघाले आहेत. ही त्यांची गॅरंटी. आम्हाला तुमचे अच्छे दिन नको. आम्हाला 2014च्या पूर्वीचे दिन द्या. कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन. 2014चे दिन मिळाले तर आमच्या आयुष्यात चांगलं होईल. हा पांढरा पायाचा माणूस सत्तेत आल्यापासून राज्याचं वाटोळं झालं. दोन कोटी नोकऱ्या देणार होते दर वर्षी. कुणाला मिळाल्या? अमित शाह यांच्या मुलाला दिल्या, असा हल्लाच त्यांनी चढवला.