शिंदे सरकार म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मंदियाळी – राष्ट्रवादीची टीका

0
347

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला असून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादीने प्रत्येक मंत्र्यावर असलेल्या आरोपाचा दाखला देत टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नवीन सरकारचे वाभाडे काढले आहेत.

आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील 40 दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.

या मंत्रिमंडळात सर्व चेहरे हे भ्रष्टाचार, आणि अनियमित कामांसाठी ओळखले गेलेले चेहरे आहेत. अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यातील आरोपी आहेत तर संजय राठोड हे एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. बोगस पदव्या, वादग्रस्त वक्तव्य, अधिकाऱ्यांना दमदाटी, महाराष्ट्र विकत घेण्याची भाषा करणारे तानाजी सावंत असे लोक मंत्रिमंडळात आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या घडवलेल्या सुसंकृत राजकारणाला बट्टा लावून महाराष्ट्राची देशात बदनामी या शिंदे गट-फडणवीस सरकारकडून झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारच्या अन्यायी कारभाराला ताकदीने विरोध करेल.