महाराष्ट्र कमावला बिहार गमावला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा अखेर राजीनामा

0
263

– राष्ट्रीय जनता दला बरोबर सरकार स्थापन कऱण्याच्या हालचाली

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी करत महाराष्ट्र कमावला पण दुसरीकडे हातातील बिहार गमावला आहे. बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. याद्वारे त्यांनी भाजपची साथ सोडल्यावर शिक्कामोर्तब झालंय. यानंतर आता ते राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत.मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार हे राजदच्या नेत्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. याठिकाणी बैठकीनंतर राजदसोबत नवं सरकार स्थापण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, “आपण एनडीए सोडायला हवी यावर जनता दलाच्या (युनायटेड) सर्व खासदार आणि आमदारांचं एकमत झालं. त्यानंतर लगेचच मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला”
भाजपवर हल्लाबोल करताना नितीशकुमार म्हणाले की, त्यांनी नेहमीच त्यांचा अपमान केला. बिहारमधील नवीन सरकारबद्दल उपेंद्र कुशवाह यांनी नितीश यांचे आधीच अभिनंदन करताना म्हटले की, नितीश जी, पुढे जा, देश तुमची वाट पाहत आहे.