शिंदे यांचे सचिव व मित्रमंडळींच्या नाड्या ‘ईडी’ने आवळल्यानेच त्यांची ही ‘क्रांती’

0
324

– दै. सामनातून अत्यंत कठोर शब्दांत शिंदे गटावर टीका

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज्यातील वेगवगेळ्या भागांचे दौरे करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक गटावर शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे ईडीच्या भीतीने भाजपासोबत गेल्याचा दावा करतानाच शिवसेनेनं “मुख्यमंत्री हे विचित्र मनुष्यप्राणी आहेत,” असंही म्हटलंय. रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुनही शिवसेनेनं शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे नेमके कोणते विचार शिंदे गट पुढे नेत आहे असा प्रश्न विचारताना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाने मवाळ भूमिका घेतल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

तुताऱ्या फुंकून आले
“मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. अर्थात महाराष्ट्राला कळत असले तरी भाजपास वळायला वेळ लागेल हे मात्र खरेच. अशा या मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्र दौरा काढला व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भागात ते तुताऱ्या फुंकून आले. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत. त्यांच्या तोंडी क्रांती, उठाव असे शब्द येऊ लागले आहेत,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून शिंदे यांच्यावर टीका केलीय.
“संभाजीनगरच्या मुक्कामी मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांना ४० आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे…
शिवसेनेनं शिंदे हे स्वत: ईडीला घाबरुन भाजपासोबत गेल्याचंही म्हटलंय. “स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे. शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाड्या ‘ईडी’ने आवळल्यावरच त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे संभाजीनगरात म्हणाले, ‘राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे.’ शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? राज्यात शिंदे-फडणवीसांनी फक्त शपथ घेतली. त्याला एक महिना उलटूनही अद्याप सरकारचा पाळणा हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशीच या लोकांची अवस्था झाली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

अब्दुल सत्तार यांना शाब्दिक चिमटे…
“शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ‘ईडी’च्या भीतीनेच लोक सैरावैरा पळू लागले व त्याच भयग्रस्त अवस्थेत ते शिंदे यांच्या गलबतात चढले. ते गलबतही आता भरकटले आहे. त्यांच्या विचारांना दिशा नाही व कृतीला कर्तृत्वाची जोड नाही. शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आपण हाणून पाडल्याची भाषा शिंदे यांनी सिल्लोडच्या मेळाव्यात केली. सिल्लोडची भूमी त्यांनी क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी निवडली, पण सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे,” अशा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान…
“शिंदे यांनी राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान तर्कसंगत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाले असते तर राष्ट्रवादीचे गुणगाण करताना हे महाशय दिसले असते. शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रीपद हडपायचे होते. भाजपा-ईडी युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला. तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे. पुन्हा ‘गेल्या अडीच वर्षांत बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा झाली. त्यांच्या विरोधी भूमिका घेण्यात आली,’ असा ‘दिव्य दाहक’ विचारही शिंदे यांनी मांडला. बाळासाहेबांच्या कोणत्या विचारांशी प्रतारणा झाली आणि आता शिंदे व त्यांचा गट बाळासाहेबांचे कोणते विचार पुढे नेत आहेत?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता
“हिंदुत्व हा तर महत्त्वाचा विचार आहेच, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. त्याच मराठी अस्मितेवर व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अपमानाच्या गुळण्या टाकण्याचे काम राज्यपाल महोदयांनी केले, पण शिंदे यांनी त्यावर गप्प बसणे पसंत केले. महाराष्ट्राचा अपमान सहन करा व शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कुणी नख लावत असेल तर चवताळून उठा, अपमान करणाऱ्याच्या नरडीचा घोट घ्या, हाच बाळासाहेबांचा विचार आहे व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना शिंदे यांनी त्या विचारांशी प्रतारणा केली. हे खरे की खोटे?” असंही शिवसेनेनं विचारलंय.

भाजपाने शिंदेंच्या मदतीने शिवसेना संपवण्याचा डाव टाकला पण…
“शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव त्यांनी हाणून पाडला. मग महाराष्ट्राच्या बदनामीचा, मराठी माणसाला खतम करण्याचा, महाराष्ट्रातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा राज्यपाली डाव शिंदे का बरे हाणून पाडू शकले नाहीत? मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असा टोला त्यांनी मारला. मग त्यांना कोणी अडवले आहे? धर्मवीरांचे वंशज केदार दिघे यांनी त्यावर शिंदे यांना चांगलेच हाणले आहे. मुळात भाजपाच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

…कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान…
“शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही,” असा इशारा लेखाच्या शेवटी शिवसेनेनं दिलाय