लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करा – आमदार महेश लांडगे

0
260

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) – महाराष्ट्रात हिंदूत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी करावी. तसेच, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गो-हत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर सारख्या हिंदू धर्मविरोधी प्रवृत्ती बळावल्या आहेत. महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायदा आपल्या सरकारच्या काळात लागू करण्यात आला. मात्र, अद्यापही अवैधरित्या गो वंश संपवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. लव्ह जिहाद सारख्या घटनांमुळे हिंदू मुली असुरक्षित आहेत. दुसरीकडे, भुलथापा करुन धर्मांतर करुन हिंदू बांधवांवर अन्याय-अत्याचार करण्यात येत आहे.

हिंदू धर्मविरोधी आणि लव्ह जिहाद सारख्या विकृती विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘हिंदू जनगर्जना’’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुमारे २५ हजारहून अधिक हिंदू बांधव रस्त्यावर उतरले. हिंदू धर्म रक्षणासाठी आणि हिंदूत्वाच्या विचारांचे संवर्धन करण्यासाठी काढलेला हा प्रातिधिक मोर्चा हिंदू विरोधी प्रवृत्तींच्या मनात धस्स करणारा ठरला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

राज्यात हिंदूत्वचा विचार पुढे नेणारे सरकार…
राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या रुपाने ‘‘हिंदूत्वाचा विचार’’ पुढे नेणारे सरकार आहे. देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करुन हिंदू धर्म आणि हिंदूत्वाचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी तमाम हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करुन आण गो-हत्या बंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतराबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.