“या” घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स

0
183

नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) – आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) समन्य बजावलं आहे. दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्यविक्री घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. याआधी केंद्रीय तपास यंत्रणेनं ( सीबीआय ) एप्रिल महिन्यात केजरीवाल यांची चौकशी केली आहे. दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्याकडे ईडीनं मोर्चा वळविला असल्याचं दिसत आहे.

केजरीवालांना ईडीनं समन्स बजावल्यानंतर मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर टीकास्र डागलं. “कुठल्याही किंमतीत आम आदमी पक्षाला संपवणे हेच केंद्र सरकारचं उदिष्ट आहे. खोटा गुन्हा दाखल करून अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात पाठवण्यासाठी भाजपा सरकारकडून प्रयत्न केला जातोय,” असा आरोप भारद्वाज यांनी केला.

२०२०-२१ मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक देणारे निर्णय पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल सरकारवर आहे.