..म्हणून कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध अशक्य

0
315

पुणे, दि. १३ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या अनेक वर्षाच्य परंपरेला भाजपने गेल्या काही वर्षापुर्वी खंड पाडला. महाराष्ट्राच्या इतिहासात जर कोणत्या पक्षाच्या आमदाराचा मृत्यू झाला तर त्या आमदाराच्या घरातील व्यक्तीला बिनविरोध निवडणून देण्याची प्रथा होती मात्र पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापुरमध्ये या परंपरेला खंड पडला. देगलूर, पंढरपूर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार निवर्तले असताना तिथे भाजपने आपला उमेदवार दिला आणि बिनविरोधची प्रथा मोडित काढली. आता पुणे शहरातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टीळक आणि चिंचवड विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपला बिनविरोध देण्यास राष्ट्रवादीतून कडवा विरोध आहे.

देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. परंपरेनुसार या जागांवर दोन्ही आमदारांच्या घरातील उमेदवार त्या-त्या पक्षांनी दिले मात्र या निवडणुका बिनविरोध होतील असं वाटत असताना या रिक्त जागांसाठी भाजपने आपले उमेदवार देत ही निवडणुक बिनविरोध होवून दिली नाही. असचं दक्षिण कोल्हपुरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं कोरोनामुळे निधन झाले आणि ही जागा देखील रिक्त झाली. काँग्रेसने या जागेवर दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. मात्र या जागेवर भाजपने देखील आपला उमेदवार दिला आणि ही देखील निवडणुक बिनविरोध केली नाही. पण भाजपला पंढरपूर सोडता या सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, हीच वेळ भाजपवर आली आहे, विधानसभेच्या निवडणुकांना अजून २ वर्षे अवधी बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपला एका महिन्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले तर पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ही याच महिन्यात निधन झाले आहे. परिणामी या जागांवर राष्ट्रादी उमेदवार देणार असल्याचे बोलले जाते. पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विनंती करून देखील भाजपने उमेदवार दिला. आणि या जागेवर राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. यामुळे पुण्यातील दोन्ही जागा रिक्त झाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप हे मुळ राष्ट्रवादीचेच नेते होते, मात्र २०१४ च्या निवडणुकीत तांत्रिक अडचणीमुळे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र हा मतदारसंघ पारंपारीक राष्ट्रवादीचाच होता. यामुळे या जागेवर राष्ट्रवादी दावा करू शकते. दुसरीकडे कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील यांना कसब्यातून निवडणुक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र पक्ष काय भुमिका घेणार हे बघावं लागेल.

मविआच्या रिक्त मतदारसंघात भाजपने उमेदवार देवून गोची केली होती. यामुळे आता या दोन रिक्त मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार देणार की बिनविरोध करणार हो महत्त्वाचं असणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना त्याला महत्त्व आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार देऊन चांगलील रंगत आणली होती मात्र जेष्ठ नेते शरद पवार, राज ठाकरे आदि नेत्यांनी विनंती केल्यानंतर अखेरच्या क्षणी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. याच धर्तीवर कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून राष्ट्रवादीला साकडं घालण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र राष्ट्रवादी पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणार असल्याचं ही बोलले जात आहेत.
चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी किंवा माजी नगरसेवक शंकर जगताप यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पत्नी म्हणून आश्विनी यांना मोठी सहानुभूती मिळू शकते म्हणून भाजप आणि रा.स्व.संघातील वरिष्ठांचा त्यांच्या नावाला होकार आहे. तर आगामी महापालिका निवडणुकिसाठी संघटना सांभाळायची तर शंकर जगताप यांनाच संधी दिली पाहिजे, असाही मतप्रवाह भाजपमध्ये आहे. जगताप कुटुंंबियातून शंकर जगताप हेच नाव निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत.

चिंचवड बिनविरोध कदापि होणार नाही –
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिनविरोध जागा द्यायची नाही, असा राष्ट्रवादीतील बहुतांश नेत्यांचा निश्चय आहे. या जागेवर राष्ट्रवादीतून जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संजोग वाघेरे, मोरेश्वर भोंडवे असे तालेवार नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतून उध्दव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचे नाव महाआघाडीच्या वतीने आयत्यावेळी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१९ च्या निवडणुकित कलाटे यांना सर्व राजकीय पक्षांनी हातचे राखून साथ दिल्याने त्यांना तब्बल १ लाख ११ हजार मते मिळाली होती. त्यामुळे आमदार जगताप कुटुंबियांसाठी आणि भाजपसाठी ही पोटनिवडणूक आता सोपी असेल असे वाटत नाही.