राळेगणसिद्धी, दि. ५ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मधस्थीनंतर सात दिवसानंतर अण्णा हजारे यांनी आज (मंगळवार) उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे मी संतुष्ट आहे आणि मी आता उपोषण सोडत आहे, अशी घोषणा अण्णांनी केली.
लोकपाल आणि लोकायुक्त यासाठी अण्णांनी गेल्या सात दिवसापासून उपोषणाला सुरूवात केली होती. त्याबाबत केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांची सुमारे सहा तासांपेक्षा जास्त काळ आज चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली असून त्यांच्या विनंतीनंतर अण्णांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
लोकपाल संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुढची कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोकायुक्त कायद्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही ड्राफ्ट कायद्याच्या स्वरूपात मांडू , असेही आश्वासन त्यांनी दिले. कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात अण्णांनी स्वायत्ततेची मागणी केली होती या संदर्भातही आम्ही निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.