कोलकता, दि. ५ (पीसीबी) – अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले धरणे आंदोलन आज (मंगळवार) मागे घेतले आहे. हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जी यांची आज भेट घेऊन सर्व विरोधक तुमच्या पाठिशी आहेत, असे सांगून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच ममता बॅनर्जी यांची विरोधकांसोबत फोनवर चर्चाही झाली. यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढील आठवड्यात दिल्लीत हा मुद्दा आम्ही पुन्हा उपस्थित करु, असे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारला राज्यासहित सर्व यंत्रणांवर आपले नियंत्रण ठेवायचे आहे. पंतप्रधान मोदींनी राजीनामा देऊन पुन्हा गुजरातला परतावे. तिथे एक व्यक्ती एक सरकार आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.