महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी देशासाठी गेले; महाजन आणि मुंढे कशासाठी गेले? – सचिन सावंत

0
488

मुंबई, दि. ६ (पीसीबी)  – लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारसभेत पंतप्रधान  मोदी यांनी काँग्रेसचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर वन अशी टीका केली होती. यावर काँगेस नेत्यांनी  आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस  प्रवक्ते सचिन सावंत यांनी  महाजन आणि मुंडे यांचे नाव घेत एक वादग्रस्त ट्विट केले होते.  मात्र, वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताच सावंत यांनी ट्विट हटवले आहे.

सचिन सावंत यांनी  भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत भाजपवर  निशाणा साधला. सावंत यांनी ट्विट करत  ‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी गेले.  महाजन आणि मुंढे कशासाठी गेले?’,असा  खोचक प्रश्न  केला होता.  मात्र त्यांनी  हे ट्विट लगेच हटवले आहे.

सावंत याबाबत म्हणाले की, आज ज्या पातळीवर भाजप आणि मोदी, जेटली सारखी मंडळी घसरुन राजीव गांधी यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. याचकरीता ट्विट केले होते. परंतु आता डिलीट करत आहे.  असंस्कृतांबरोबरही संस्कृती राखणे ही भित्रेपणाचे लक्षण नसून त्यातच शौर्य असते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.