इंग्लंड, दि. ६ (पीसीबी) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मे अखेर २०१९ विश्वचषकाची सुरुवात होत आहे. तर भारत-पाकिस्तान मध्ये १६ जूनला मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर लढत होणार आहे. या सामन्याची सगळी तिकीटे अवघ्या दोन दिवसांत संपली आहेत. यावरून दोन्ही देशातील चाहते हा सामना पाहण्यासाठी किती आतुर आहेत, हे दिसून येते.
विश्वचषकाच्या इतिहासात एकदाही पाकिस्तानने भारताचा पराभव केलेला नाही. २०१५मध्ये विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी त्यांचे टीव्ही फोडल्याच्या घटना घडल्या होत्या.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी विश्वचषकात भाकताने एकही सामना खेळू नये, अशी मागणी करण्यात येत होती. पाकिस्तानला विश्वचषक खेळू देऊ नका, अशी मागणीही बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. पण अखेर बीसीसीआयने दोन पावले मागे घेत पाकिस्तानशी खेळण्याची तयारी दर्शवली होती.
दरम्यान, मॅन्चेस्टरच्या याच मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये २६ जूनला सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. भारत-पाक सामन्याची तिकीट विकत घेणाऱ्यांमध्ये भारतीय चाहत्यांची संख्या मोठी आहे.