जयपूर, दि. २ (पीसीबी) – संयुक्त राष्ट्राने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हा भारताच्या कूटनितीचा विजय आहे. मात्र, ही केवळ सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होते. प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. विरोधकांनी या उत्साहाच्या वातावरणाचा भंग करु नये, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत आहे आणि हा नवीन भारताचा आवाज आहे. भारताने २०१९ मध्ये केलेल्या पाचव्या प्रयत्नात चीनला हार मानावी लागली आहे. आज मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. प्रत्येकवेळी चीनने खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलवामा घटनेनंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनलाही भारताच्या प्रस्तावापुढे झुकावे लागले आहे.
मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणे, हे केवळ मोदीचे यश नाही, तर संपूर्ण देशाचे यश आहे. हा नवीन भारत आहे, हा नवीन भारताचा आवाज आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होते. आज प्रत्येक भारतीयसाठी अभिमानाचा दिवस आहे. विरोधकांनी या उत्साहाच्या वातावरणात भंग करु नये, असे आवाहन मोदी यांनी विरोधकांना केले.