भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. – अशोक चव्हाण

0
316

मुंबई  दि. २९ (पीसीबी) – भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. हा प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. असे असताना एकनाथ शिंदे गटात सामील झालेले, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे रोज २०-२२ तास काम करतात. त्यांच्या कामात आडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे हेमंत पाटील म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

“मी अशोक चव्हाण यांचे विधान काय आहे, ते अद्याप ऐकलेले नाही. सत्तेमध्ये सर्वात मोठे भागीदार असताना अशोक चव्हाण यांनी तेव्हाच हा गौप्यस्फोट का केला नाही? एकनाथ शिंदे रोज २०-२२ तास काम करत आहेत. रोज वेगाने निर्णय घेत आहेत. लोकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल समाधान आहे. या कामात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे मला वाटते,” असे हेमंत पाटील म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी बुधवारी नांदेडमध्ये बोलताना महाविकास आघाडीच्याआधी आधी फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव आल्याचा दावा केला आहे. “भाजपासोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भूमिका फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव घेऊन शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तत्कालीन वरीष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. या सर्वांनी माझ्या मुंबई कार्यालयात माझी भेट घेतली होती, असेही चव्हाण म्हणाले.