पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीचे प्रकरण !

0
239

पुन्हा विठुरायाचा गजर दुमदुमला; अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी !
– हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या विरोधाला यश

पिंपरी दि. २९ (पीसीबी) -पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी कारभार करत भजन, कीर्तन आणि नामजप करण्यास बंदी घालणार्‍या सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची महाराष्ट्र शासनाने उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. गजानन गुरव यांनी कोणताही लेखी आदेश न काढता, बैठक न घेता, कोणालाही विश्वासात न घेता केवळ तोंडी आदेशाद्वारे अचानक श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तनावर बंदी घालण्यात आली होती. याचा हिंदु जनजागृती समिती आणि समस्त वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध केला होता. श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन नाही करायचे तर कुठे करायचे ? असा प्रश्न करत देवस्थान समितीमध्ये विठ्ठलाचे भक्त अधिकारी-कर्मचारी असावेत आणि गजानन गुरव यांना मंदिर समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली होती. ही मागणी शासनाने मान्य केली आणि आदेश काढून गुरव यांची या पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे पुन्हा एकदा श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन आणि विठुरायाचा गजर दुमदुमला आहे, याबद्दल आम्ही श्री विठुरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

मंदिरांच्या सरकारीकरणाचे आतापर्यंत अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. मंदिरांच्या देवनिधीमध्ये भ्रष्टाचार करणे, देवस्थानांच्या जमीनी लाटणे, देवतांच्या दागिन्यांमध्ये चोरी, मंदिराच्या प्रथा-परंपरा बदलणे अशा अनेक गोष्टी दिसून येतात. सुव्यवस्थापनाच्या नावाखाली जर मंदिरांतील प्रथा-परंपरा सरकारी अधिकारी बदलणार असतील, तर अशा अधिकार्‍यांना यापुढेही आम्ही धडा शिकवू. तसेच सर्वार्थाने अयोग्य असलेले मंदिर सरकारीकरण रहित व्हावे, यासाठी आमचा लढा अधिक तीव्र करू, असेही श्री. घनवट म्हणाले. देशभरात एकाही मशीदीचे सरकारीकरण नाही, एकाही चर्चचे सरकारीकरण नाही; मग केवळ मंदिरांचे सरकारीकरण का ? हे धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या तत्त्वात बसते, असा प्रश्न करत मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याची मागणीही श्री. घनवट यांनी या वेळी केली.