‘नवीन मतदार नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवा’: भाजपाची मागणी – महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यु. पी. एस. मदान यांना निवेदन

0
324

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – नवीन मतदार नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवावी. ज्यामुळे अधिकाधिक नवमतदारांना आपला मतदान हक्क बाजावण्याची संधी मिळेल, अशी मागणी पिंपरी- चिंचवड भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.

याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यु. पी. एस. मदान यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य निवडणूक विभागाच्या वतीने नवीन मतदार नोंदणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्या बाबत सविस्तर कळविण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. मात्र नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यानंतर नाव नोंदणी करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीचा वेळ हा अत्यंत कमी आहे. त्यामुळे अनेक मतदार आपले नाव नोंदविण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात मतदार नोंदणीविषयी योग्य जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना त्याबाबत माहितीच नसल्याचे चित्र होते.

महाराष्ट्र राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांचा विचार करता मतदार नोंदणी करण्यासाठ अनेकजण प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत जास्तीत- जास्त नव मतदारांना आपला मतदान हक्क बजावता यावा, याकरिता मतदान नोंदणीची मुदत १५ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी या मागणीचा गांभीर्याने विचार करून मुदत वाढवावी, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे .