कत्तलीसाठी वासरू घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा

0
169

निगडी, दि. २ (पीसीबी) – गीर जातीच्या वासराला कत्तलीसाठी रिक्षातून घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले. या तिघांना वासरू विकणाऱ्या त्यांच्या साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवारी (दि. १) सकाळी निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव येथे करण्यात आली.

रिक्षा चालक अब्दुल महेबूब सय्यद (वय २५, रा. चिंचवड), हर्षद कय्युम कुरेशी (वय १९, रा. पिंपरी), पप्पू तुपे (वय २०, रा. रावेत) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल नामदेव खुडे (वय ३६, रा. देहूरोड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुडे रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गणेश तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक रिक्षा भरधाव वेगात जाताना आढळली. खुडे यांनी रिक्षाला अडवून चौकशी केली असता आरोपी गीर जातीचे वासरू कत्तल करण्यासाठी घेऊन जात होते. वासराला आरोपींनी निर्दयतेने रिक्षात घातले होते. रावेत पोलीस तपास करीत आहेत.