आता बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा मतदारसंघ भाजपाचे टार्गेट

0
228

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : राज्यसभेचा निकाल नुकताच हाती आलाय तर विधान परिषदेचा धुराळा सध्या सुरु आहे. अशातच भाजपने कैक पाऊल पुढे टाकत २०२४ लोकसभेची तयारी सुरु केली आहे.भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ आखलं आहे. त्यानुसार सगळं काही प्लॅनिंग ठरल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीय करतोय’, असंही फडणवीसांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीच ंप्लॅनिंग आजच्या बैठकीत झालं. यावेळी बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा मतदारसंघात जोर लावण्याच्या सूचनाही फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत, याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर देखील लक्ष ठेवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. एकंदरित राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी आतापासून तयारी सुरु केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

१६ मतदारसंघावर लक्ष, पण ८ मतदारसंघाबाबत विशेष दक्ष
फडणवीस म्हणाले, “ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीय करतोय. १६ मतदारसंघ आम्ही निवडलो आहेत, याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर आम्ही अधिक लक्ष ठेवणार आहोत, असं सांगत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. ज्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत”.

मिशन ४५, चंद्रशेखर बावनकुळेंकडे विशेष चार्ज!
“त्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या जागांसाठी आम्ही एक कमिटी गठित केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे कोऑर्डिनेट करत आहेत. आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आज बैठकीसाठी आले होते. पुढच्या १८ महिन्यांचं प्लॅनिंग ठरलं. त्याची स्टॅस्ट्रेजी ठरली आहे. प्रभारींचा काय रोल असणार आहेत, त्यांचं काम आहे, कधी दौरे करायचे, कुठे दौरे करायचे, याची माहिती देण्यात आली”

निवडणूक काम हे भाजपचं रुटीन काम, आश्चर्य वाटून घेऊ नका –
“भाजपचं हे रुटीन काम आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा लगेच तीन वर्षात आम्ही २०१९ ची तयारी सुरु केली होती. आताही पुढील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरु करत आहोत. भाजपच्या हा कामाचा भाग आहे. केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असं नाही. सातत्याने तयारी केली पाहिजे, लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे. लोकांपर्यंत योजना पोहोचतात की नाही, लोकांना लाभ मिळतोय की नाही याचा आढावा घेतला पाहिजे, अशा कारणांतून भाजपने हे मिशन आखलेलं आहे”.

अहमदनगर, अकोला, बीड, भंडारा, भिवंडी, धुळे, दिंडोरी, गडचिरोली, जळगाव, जालना
लातूर, माढा, मुंबई उत्तर, उत्तर मध्य, मुंबई ईशान्य, नागपूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, रावेर
सांगली, सोलापूर, वर्धा या मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार आहेत.