अनधिकृत बस वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा

0
161

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – अनधिकृत बस वाहतुकीवर आठ दिवसांच्या आत परिवहन विभागातर्फे कडक कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे देण्यात आला आहे.

शहराध्यक्ष सचिन चिखले, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. वेळेस उपाध्यक्ष नितीन सुर्यवंशी,कृष्ण महाजन, दत्ता देवतरासे,नितीन चव्हाण, रोहिदास शिवनेकर, गणेश वाघमारे ,जय सकट,प्रदीप जाधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात काही दिवसांपासून आराम बस जळण्याच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहेत. थोड्या दिवसापूर्वी नाशिक येथे आराम बस आणि ट्रक या मध्ये अपघात होऊन बस मधील 12 जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्याच दुर्घटनेनंतर 2 ते 3 दिवसानंतर मुंबई भीमाशंकर मार्गावर एक आराम बस जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही वाहने सुव्यवस्थित नसल्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण फार मोठे आहे. बस मालक व्यवसाय चालण्यासाठी बसमधून अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. या गाड्यांना परवानगी नसताना ही त्या गाडीच्य डिग्गी मधून माल वाहतूक,मोटर सायकल, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जाते. हे सर्व राजरोपणे चालू असताना प्रशासनाचा या बस व्यवसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. या सर्व अनधिकृत बस वाहतुकीवर आठ दिवसांच्या आत परिवहन विभागातर्फे कडक कार्यवाही करण्यात यावी. . या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या अवैध रिक्षा ,स्क्रॅप रिक्षा, ओव्हरलोड वाहतुकीवर कार्यवाही ,अवैध प्रवासी वाहतूक ,स्कूल बसची तपासणी करण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली.