राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये

0
226

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही… असं खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवलं. ते म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा टोला त्यांनी लगावला.

‘शरद पवार हे ओसाड गावचे पाटील’
अजित पवारांना टोला लगावतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचं कौतुक करण्यात आलंय. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालंय. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात, बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे.