सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला

0
238

मुंबई, दि. २० (पीसीबी) : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला.

तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण संप सुरु असल्याने अवकाळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना खिळ बसली होती. मात्र आता संप मिटल्याने पंचनाम्यांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.