सत्तास्थापनेच्या विलंबासंदर्भात राज्यपालांशी चर्चा- चंद्रकांत पाटील

0
356

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी राजभवनाबाहेर माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. सरकार स्थापन होण्यासाठी विलंब लागला आहे. याचसंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. आता पुढचे पुढे ठरवू असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे तिघेही उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या दोन मागण्यांमुळे शिवसेना आणि भाजपात चर्चा थांबली आहे.