मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात सूरत पॅटर्न, काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम भाजपमध्ये

0
34

देश, दि २९ एप्रिल (पीसीबी ) काँग्रेसला सूरतमध्ये आणखी एक झटका बसला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात सूरत पॅटर्न बघायला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारी घेतली. इतकंच नाही, तर अक्षय कांती बम यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी पंचाईत झाली असून, भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला झाला आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी अक्षय कांती बम यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. “इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये स्वागत आहे”, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरायचे होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ एप्रिल आहे. शेवटच्या दिवशीच काँग्रेसला झटका बसला. पक्षाला कळण्यापूर्वीच कैलास विजयवर्गीय यांनी काँग्रेसचा उमेदवार फोडला. त्यामुळे काँग्रेसला आता दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय कांती बम यांच्याविरुद्ध १७ वर्षांपूर्वी एक गुन्हा दाखल झालेला होता. त्यात तीन दिवसांपूर्वी कलम ३०७ तही टाकण्यात आले. काँग्रेसच्या अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांच्यासमोर कोणतेही मोठे आव्हान नाही. आता काँग्रेसचे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. या मतदारसंघातून काँग्रेसने निलेश कुंभानी यांना उमेदवारी दिली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरवला. त्यांच्या अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये गडबड करण्यात आली असल्याचे सांगत हा अर्ज बाद ठरवला गेला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरवल्यानंतर इतर अपक्ष उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुकेश दलाल यांची बिनविरोध म्हणून निवड झाली. निवडणूक आयोगाने त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही दिले आहे.