शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार, शिंदे गट आक्रमक

0
110

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून आता भाजपाच्या मित्रपक्षांकडून आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गायकवाड यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजपा-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.”

गायकवाड म्हणाले की, “शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा तो पक्ष (भाजपा) मोठा असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही. तसेच बावनकुळे यांच्याबद्दल विचारले असता गायकवाड म्हणाले की, अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी त्यांना (चंद्रशेखर बावनकुळे) समज द्यावी.”