शिंदे मंत्रीमंडळात १९ पैसी १७ मंत्र्यांवर आरोप, राष्ट्रवादीचे ट्विट

0
285

– भ्रष्ट्राचार, घोटाळा, खंडणीखोरांचे `ईडी` सरकार म्हणत टोला लगावला

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शपथ घेतलेल्या १८ पैकी १७ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी या सरकारला ‘ED’ सरकार म्हणत टोला लगावला.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात पहिली शपथ राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. राष्ट्रवादीने विखे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी भाजपावर केलेल्या टीकेचा आधार घेत निशाणा साधला आहे. भाजपाला `गँग ऑफ वासेपूर`, असे विखो पाटील म्हणाले होते आणि आता तेच भाजपा बरोबर गेले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटलांवर पुण्यातील भूखंड प्रकरणावरून घोटाळ्याचे आरोप झाले होते. तो मुद्दा उपस्थित करत राष्ट्ट्रवादीने टीका केली.
कोथरुड मधील भूखंड घोटाळ्यात बिल्डरला फायदा होईल असे प्रकरण ३४२ कोटींचे असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवर यांच्यावर निशाणा साधताना राष्ट्रवादीने त्यांच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला लक्ष्य केलं. तसेच त्यात १२५० कोटी रुपयांच्या उलाढालीचा आरोप केला. विधीमंडळात एलजीबीटीक्यू घटकांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा दाखला राष्ट्रवादीने दिला आहे. आदिवासी विकास खात्यात मोठा घोटाळा प्रकऱणात विजयकुमार गावित यांचे नाव असल्याचे राष्ट्रवादीने पुन्हा अधोरेखीत केले आहे.

राष्ट्रवादीने फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्यावर जळगावमधील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्यावरून टोला लगावला.

कोट्यावधींची संपत्ती असणारे भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर राष्ट्रवादीने खंडणी आणि फसवणुकीचे आरोप केले आहेत. मुंबंई महापालिका निवडणूक डोळ्या समोर ठेवत लोढा यांना मंत्रीपद दिल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. एकूणच राष्ट्रवादीने नव्या मंत्रीमंडळात भ्रष्टाचार, घोटाळे आणि खंडणीसह बेताल वक्तव्ये केल्याचे आरोप असलेले नेते असल्याचं म्हटलंय.

राष्ट्रवादीने भाजपासोबत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आणि महाविकासआघाडी कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या शिंदे गटातील आमदारांवरही आरोप केले.
राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारमधील १८ पैकी १७ आमदारांवरील आरोपांचा आधार घेत शाब्दिक हल्ला चढवला.

केवळ दादा भुसे यांच्यावरच या पोस्टर्स मालिकेत थेट आरोप करण्यात आले नाही. त्याचीही चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी या पोस्टर्सच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकार भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना मंत्री म्हणून संधी देत असल्याचं अधोरेखित करत आहे. महाविकास आघाडीच्यान नेत्यांनी भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा व शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपा-शिंदे गटाचे नेते विरोधकांचे आरोप फेटाळत आहेत.

असं असलं तरी पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात भाजपाचे अनेक नेते आघाडीवर होते. त्यामुळे राठोडांच्या मंत्रीमंडळ सहभागाबाबत भाजपाची कोंडी झालीय. राठोड यांंच्यावर भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही कठोर प्रहार केला आहे. फडणवीस आणि चित्रा वाघ यांनी राठोडांविरोधात सबळ पुरावे असल्याचं म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे आता राठोडांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असल्याचा दावा भाजपा नेते गिरीश महाजन करत आहेत. तसेच चित्रा वाघ यांनी राठोडांच्या मंत्रीमंडळ समावेशाबाबत केलेलं वक्तव्य भाजपाची भूमिका नसून त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, असंही महाजन यांनी म्हटलंय.