शरद पवार यांच्या राजीनाम्यावर एकट्या अजितदादांचा वेगळा सूर

0
230

– `लोक माझे सांगाती` पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मोठी खळबळ

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली. पवार यांनी भाषण करत असतानाच हा निर्णय घोषित केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी एकजात सर्वजण करत असतानाच एकट्या अजित पवार यांनी, साहेबांनी एकदा निर्णय घेतला आहे, ते आता माघार घेणार नसल्याचे थोडे चढ्या आवाजात समर्थन केल्याने उपस्थित सगळेच हाबकले. राष्ट्रवादीत अत्यंत अगदी गंभीर वातावऱण झाल्याने कुठेतरी काहितरी मोठे शिजत असल्याची भावना अनेकांची आहे.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भावना अनावर झाल्या होत्या. हुंदका आवरत ते म्हणाले, पवार साहेबांच्या नावामुळे आम्ही आहोत. तेच बाजुला गेले तर आम्ही कोणाकडे पाहायचे. देशाच्या राजकारणासाठी नव्हे तर सर्वांसाठी गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो. असा निर्णय घेणे कोणालाही मान्य होणार नाही. त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना पाहिजे. त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केले. त्यांची प्रेरणा घेऊनच राजकारणात वावरतो. त्यांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली. तुम्हाला आम्ही सर्वाधिकार देतो, आम्ही सर्व राजीनामे देतो आणि तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याची सवय लागली आहे. आम्ही काम करू शकत नाही. तुम्ही थांबला तर आम्ही सगळे थांबतो.

अनिल देशमुख म्हणाले, आम्हाला पोरके करू नका.हसन मुश्रिफ – आजवर आमचे जीवन जे घडले ते तुमच्यामुळे घडले. निर्णय मागे घ्यावा.सर्व बड्या नेत्यांचे भावनिक निवेदन झाल्यावर विधानसभेचे विरोधी नेते अजित पवार यांनी वेगळाच सूर लावल्याने सगळ हाबकले. ते म्हणाले, सगळ्यांच्या भावना साहेबांना एकल्या आहेत. तुम्ही एक गैरसमज करून घेताय. आज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खर्गे पण पक्ष सोनिया चावलतात. नवीन नेतृत्वाखाली पार्टी येत आहे, तर बिघडले कुठे. आता पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. साहेब अध्यक्ष असो वा नसो आपला परिवार असाच चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका. परवाच त्यांनी सांगितले भाकरी फिरवायची आहे. मी काकीशी बोललो, ते माघार घेणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी चालणार आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
पर्याय म्हणून कोणीच नाही. नवीन अध्यक्ष होणार आपण त्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू. काळानुरुप निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्या देखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे… साहेब देशात फिरणार आहेत, मार्गदर्शन कऱणारच आहेत… साहेबांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहोत. भावनिक होण्याचे कारण नाही. हा निर्णय १ मे ला जाहीर करणार होते, पण वज्रमुठ सभा होती.दरम्यान, या विषयावर सुप्रिया सुळे यांना बोलू द्यावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते करू लागले, पण अजित पवार यांनी अगदी चढ्या स्वरात, सुप्रिया तू बोलू नको, तिचा मोठा भाऊ म्हणून मी तिला सांगतोय, बोलू नका बाकिचे.