लक्ष्मणभाऊंच्या रुपाने अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले – देवेंद्र फडणवीस

0
207

पिंपरी , दि. १५ (पीसीबी) – – पिंपरी-चिंचवडच्या विकासात अग्रस्थानी म्हणून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव घेतले जाते. साधी राहणी, उच्च विचार व महान कार्य असणारे शहरातील अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या रुपाने हरपले आहे, अशा भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मणभाऊ यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने शहरात विधी महाविद्यालय उभारण्याची आणि महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

तसेच भाऊंची विधी महाविद्यालय सुरू करण्याची आणि भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे मंदीर उभारण्यासाठी मदत करण्याची इच्छा होती. त्यांच्या स्मरणार्थ मंदिरासाठी जिल्हा नियोजन समितीतून 5 कोटींचा निधी आणि भाऊंच्या नावाने विधी महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (शनिवारी) सर्व राजकीय पक्षांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शोकसभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, मनसेचे नेते बाबू वागसकर, निवृत्त विभागीय आयुक्त व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप बंड, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, प्रहारचे संजय गायखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे भारत महानवर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लक्ष्मणभाऊ हे आपले लाडके आणि उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मोठ्या व्यक्तीची प्रचिती त्याच्या कार्यातून येते. शरीराने फिट असणारा सहकारी मित्र गमावला. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही.आजाराच्या काळातही त्यांच्यात इच्छाशक्ती प्रचंड होती. पिंपरी-चिंचवडसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. संघर्षातून त्यांनी हे योगदान दिले. त्यांनी सामान्य माणसांशी आपली नाळ कधीच तुटू दिली नाही. ते कायम भूमीपूत्रांच्या समस्या प्रकर्षाने मांडायचे. सामान्य माणूस आणि भूमीपुत्रांच्या समस्या घेऊनच ते माझ्याकडे यायचे. जनसामान्यांचा नेता या रुपाने आम्ही त्यांना बघितले. कधी ते नाराज होत नव्हते. काम पूर्ण होईपर्यंत ते पाठपुरावा करायचे. ते शहराध्यक्ष झाले आणि कामाचा विस्तार वाढला. त्यांच्या अध्यक्षतेखालीच महापालिकेत प्रचंड मोठा विजय आम्ही प्राप्त करू शकलो. त्यांनी सातत्याने लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीच प्रयत्न केला.  तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते ऍम्ब्युलन्समधून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले.

भाऊ म्हणजे अजब रसायन होते. जिद्दीमुळेच ते दुर्धर आजाराशी संघर्ष करू शकले. जमिनीशी, लोकांशी जोडलेले व्यक्तीमत्व होते. स्वयंभू माणसे निघून गेले की समाजाची हानी होते. पण त्यांच्याकडून प्रेरणाही मिळत असते. आमच्या व्यक्तिगत जीवनात त्यांची नेहमी आठवण राहिल. भंडारा डोंगरावर जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी मदत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत केली जाईल. त्याचप्रमाणे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नावाने शहरात विधी (लॉ) महाविद्यालय सुरू केले जाईल. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव दिले जाईल. त्यांचे कार्य पुढे चालत राहावे यासाठी काही विचार आले तर त्याची अंमबजावणी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.”  

गिरीश महाजन म्हणाले, “राजकारणापलीरकडचा आमचा संबंध होता. ते अजातशत्रू होते. सामान्य कुटुंबातला व्यक्तीने परिश्रम आणि जिद्द मनात बाळगून प्रगती केली. राजकारण आणि व्यवसायात आपली वेगळी छाप त्यांनी उमटवली. ते राजकारणापलीकडचे होते. जिद्द, तळमळ, इच्छाशक्ती असणारा चांगला मित्र गमावला.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ते नेतेही होते आणि त्यांची भितीही वाटत नव्हती. कोणालाही वाटायचे त्यांच्याकडे जावे आणि काम सांगावे. सर्वांच्या मनात आहे की ते अजूनही आपल्यात असायला हवे होते. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांची निष्ठा पाहिली. त्यांच्यासारखी निष्ठा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

भाई जगताप म्हणाले, “२३ व्या वर्षी नगरसेवक होऊन पुढे राजकीय कारकीर्द कायम ठेवणे हे कतृत्वामुळेच शक्य होते. लक्ष्मणभाऊ हे कतृत्वान नेते होते. त्यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. झाले बाहु, होतील बहु, या सम हा. त्यांच्या नावाने आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”

अविनाश महातेकर म्हणाले, “वेगवेगळ्या समाजातील सर्व कोपऱ्यांमध्ये त्यांचा वावर असायचा. सर्वांशी त्यांचा चांगला संपर्क होता. असा हिंमतीच माणूस गेल्याने मनाला यातना होतात.”

श्रीरंग बारणे म्हणाले, “चांगले काम करणारा नेता या शहराने गमावला.एक राजकीय कार्यकर्ता कसा असावा हे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. विकासासाठी काम करताना कोणाला बरोबर घेतले पाहिजे, एखादे कार्य कशा पद्धतीने तडीला न्यावे, याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. शहरातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांच्या रुपाने हरवले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा, सहकार्य करणारा नेता लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या रुपाने हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.

आमदार महेश लांडगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.