सोलापूर, दि, ३० (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर कॉंग्रेस पक्षाने राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेयला सुरुवात केली आहे. आज सोलापूर येथे आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मात्र या मुलाखतीला कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले आहेत.
हे अनुपस्थितीत राहिलेले नेते सध्या भाजपात जाणार असल्याच्या चर्चेत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला देखील येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडणार असल्याचे दिसत आहे. भारत भालके यांनी भाजप नेत्यांशी जवळीकता वाढवली आहे. तर खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा चांगला सलोखा आहे. त्यामुळे भारत भालके देखील कॉंग्रेसचा हात सोडत भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.