मुंबई, दि. १४ (पीसीबी) – “कोणत्याही क्षेत्रात कोण परमनंट’ नसते, राजकीय क्षेत्रात जे रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वत:ला अमरतत्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण ‘परमनंट’ नसते”, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला.
कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज एका शानदार कार्यक्रमात कारखाना कार्यालयाच्या परिसरात झाले. त्यानंतर झालेल्या विराट शेतकरी मेळव्यात मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. ‘बहूजन हिताय, बहुजन सुखाय’ या मार्गांनी महाराजांनी काम केले. त्यातून एक परंपरा सुरू झाली आणि या परंपरेचे पाईक म्हणून अनेकांनी काम केले, अशांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्र घडवला. त्यात कै. विक्रमसिंह घाटगे यांचे नाव घेता येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “कै. घाटगे यांचा वारसा समरजितसिंह घाटगे समर्थपणे चालवत आहेत. एखाद्या पित्याला आपल्या पुत्राचे कर्तृत्व दिसले तर पित्याला देखील आनंद होत असतो. लोकशाहीच्या मंदीरात असो किंवा नसो जनतेचे आपण उत्तरादायित्व आहोत या भावनेतून त्यांनी काम केले. ही प्रेरणा त्यांना राजर्षी शाहू महाराजांकडून मिळाली. कै. घागे यांनी शाहू महाराजांचे ब्रीद वाक्य सांभाळले म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्थांची उभारणी ते करू शकले.”