रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

0
422

 पिंपरी दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन हॉकर्सची नोंदणी करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनेक दिवसापासून रखडलेले रस्त्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे, अनधिकृत पत्राशेड हटवावे, अशा विविध मागण्या महापालिकेच्या वतीने आज (सोमवारी) झालेल्या आठही क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना केल्या. जनसंवाद सभेत सुमारे 96 नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 9, 15, 8, 10, 15, 5, 23 आणि 11 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी,  उद्यान विभागाचे सह शहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे,  शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले.  तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारवजा सूचना मांडल्या. यामध्ये   पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी,  पाणीपुरवठा स्वच्छ आणि योग्य दाबाने करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक धूर फवारणी करण्यात यावी, वृक्षारोपण करण्यास जागा उपलब्ध करून द्यावी,  रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत आहे तो पूर्ववत करावा, ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी,  अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकत धारकांवर कारवाई करावी,  रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पदपथ आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी, रस्ता रुंदीकरण करावे,  अशा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.