माझे मुंबईत अपहरण झाले, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडले; पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचा दावा

0
635

पुणे, दि. १२ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाने त्याचे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. मनोज ज्योतिराम सातपुते असे पार्थ पवार यांच्या गाडीवर काम करणाऱ्या चालकाचे नाव आहे. ओमनी गाडीतून मुंबईत अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा इथे बेशुद्धावस्थेत सोडून दिल्याच मनोज सातपुते यांनी सांगितले.

मनोज सातपुतेंच्या दाव्यानुसार, ५ जुलै रोजी मुंबईतील कुलाबा इथे उभा असताना एक ओमनी व्हॅन त्याच्याजवळ येऊन थांबली. ओमनीमधील लोकांनी तू पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक आहे का, असे विचारुन आम्हाला पार्थ पवार यांना भेटायचे आहे, त्यांच्याकडे आम्हाला घेऊन चल असे म्हणून मला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवले. ओमनी व्हॅनमध्ये बसल्यानंतर काही अंतर पार होताच आपण बेशुद्ध पडलो. पुढचे आपल्याला काही आठवत नसून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळ बेशुद्धावस्थेत सोडून दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी सकाळी आठ वाजता मला बेशुद्धावस्थेत पुणे-नगर महामार्गावर सुपे इथे रस्त्याच्या कडेला सोडलं, अस मनोज सातपुतेंनी सांगितले. शुद्धीवर आल्यावर मनोज सातपुते पारनेरपासून जवळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील सणसवाडी या त्याच्या गावी पोहोचले आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शिक्रापूर पोलिसांनी झीरो नंबरने अपहरणाचा गुन्हा नोंद केला असून तो गुन्हा कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे.