कोल्हापूर , दि. २० (पीसीबी) – मी टोपी फेकायचे काम केले आणि ती ज्यांना बसली त्यांनीच त्याचा खुलासा केला, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना टोला लगावला.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. ज्यांना आपले काय होणार, अशी भीती असते, असे लोक भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत. हसन मुश्रीफ हे अल्पसंख्याक समाजातील सहृदयी मनुष्य आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला. तर आश्चर्य वाटायला नको, असे चंद्रकांत पाटलांनी विधान केले होते. या विधानाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील हास्यास्पद वक्तव्य का करतात, हे त्यांनाच माहित, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली होती.