भारतात माझ्या जिवाला धोका; मायदेशात परतण्यास इच्छुक नाही- नीरव मोदी

0
429

मुंबई, दि. १ (पीसीबी) – भारतात माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे मायदेशात परतण्यास मी इच्छुक नाही, असा कांगावा पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) ई-मेलच्या माध्यमातून झालेल्या संवादावेळी त्याने हा कांगावा केला आहे.

होळीला लोकांनी माझ्या पुतळ्याचे केलेले दहन मी पाहिले आहे. कर्मचारी, घरमालक, ग्राहक, संस्था यांकडून मला वारंवार धमकावलं जात आहे. भारतात माझ्या जिवाला धोका आहे. भारत माझ्यासाठी सुरक्षित जागा नाही, असं नीरव मोदी म्हणाला.

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यामागे नीरव मोदी असल्याचं समोर आल्यानंतर ईडीने नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी यांच्याविरोधात २४ आणि २६ मे रोजी आरोपपत्र दाखल केले. यानंतर या दोघांविरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले. इंटरपोलनेदेखील या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत ईडीने भारत आणि परदेशात मिळून ४, ८०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या पीएनबी घोटाळ्यात या दोघांव्यतिरिक्त अनेक बँक अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.