भारतीय वायुसेना सीमेवर २४ तास तैनात; पाक सैन्याचे धाबे दणाणणार

0
601

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारताने पाकिस्तानच्या सीमेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सतत भारतीय सीमेत घुसून कुरापती करणाऱ्या पाक सैन्याचे धाबे दणाणणार आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव प्रचंड वाढला आहे.

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील ४९ सैनिक ठार झाले होते. त्यानंतर १३ दिवसांनी भारताने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. सीमेवर दोन्ही बाजूंच्या सैन्यांकडून जोरदार गोळीबार केला जातो आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने सीमेवरती तीन अत्याधुनिक शस्त्रांनी परिपूर्ण ब्रिगेड तैनात केल्या आहेत. या ब्रिगेड्स भारतीय सैन्यावर कधीही हल्ला करू शकण्याची भीती व्यक्त केली जात होती.

सीमासुरक्षेसंदर्भात नुकतीच भारतीय सैन्याच्या पाहणी समितीची एक बैठक पार पडली. पाकिस्तानच्या सगळ्या सीमांची पाहणी केल्यानंतर वायुसेनेच्या प्रतिकारक्षम तुकड्या २४ तास सीमेवर तैनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. वायुसेनेच्या साहाय्याने भारत पाकच्या छावण्या उद्ध्वस्त करू शकतो. यामुळेच आता पाकिस्तानी सैन्य कोणतीही कुरापत करण्याआधी दहादा विचार करेल. एअरस्ट्राइकनंतर भारतीय वायुसेनेची दहशत पाकिस्तानी सैन्यााला बसली आहे. या निर्णयानंतर सीमेवरील तणाव कमी होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.