हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – बावधन येथील एका बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला घातक हत्यारांसह हिंजवडी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये करण्यात आली.
समीर उर्फ पप्पु बबन गुजर (वय २८, रा. मुळशी), किरण कुमार पिल्ले (वय २१), अजितेश राजाराम चव्हाण (वय १९), विनायक उर्फ सुनील राऊत (वय २६) आणि रितेश सुभाष शिंदे (वय २०, चौघे रा. पिरंगुट) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बावधन परिसरात हिंजवडी पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये पाच तरुण संशयितरित्या उभे असलेले दिसले. यावेळी पोलीसांनी स्टाफसह सापळा रचून पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, स्प्रे हे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता ते रामनगर कॉलनीमधील एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी पप्पु गुजर याच्यावर पौड पोलीस ठाण्यातील मारहाण आणि कोल्हापूर येथील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, उपनिरीक्षक अशोक गवारी, वरुडे, वलटे, पोलीस कर्मचारी किरण पवार, प्रमोद पवार, अतिक शेख, कुणाल शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, अमर राणे यांच्या पथकाने केली.