प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? – राज ठाकरे

0
249

मुंबई,दि.१४(पीसीबी) – फॉक्सकॉन वेदांता या कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. आता राज ठाकरे यांनीही यावरून राज्यसरकारला सवाल केला आहे. दीड लाख कोटींचा आणि प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असलेला प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये जातोच कसा असा सवाल करत याची चौकशी व्हावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

विधानसभेत मनसेचा एकच आमदार निवडून आल आहे. मनसेने मागील झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. तसेच शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी या सरकारलाही पाठिंबा दिला होता. आता फॉक्सकॉन-वेदांताचा हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याने राज ठाकरे यांनी ट्विट करून सरकारला सवाल केला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

नव्या गुंतवणूकदारांचे खोके सरकारव विश्वास नाही – आदित्य ठाकरे
फॉक्सकॉन वेदांतचा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समजले तेव्हा आपल्याला धक्का बसला अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच नव्या गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.