निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामासारखा हल्ला पुन्हा  घडवला जाईल; राज ठाकरेंचा घणाघाती आरोप

0
653

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असा  सनसनाटी आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे केला. निवडणुका होण्याआधी किंवा निवडणुकांचे टप्पे सुरु असताना पुन्हा हल्ला घडवला जाईल. सैनिकांचा वापर मतांसाठी भाजपकडून केला जाणार आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनामिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की,  २५ डिसेंबर २०१५ ला मोदी पाकिस्तानात गेले होते. त्यावेळी त्यांनी  नवाज शरीफ यांना केक भरवला होता. पुढे सहा ते सात दिवसात पठाणकोट येथील हवाई तळांवर हल्ला झाला. इतर निवडणुकांच्या आधीही असेच प्रकार घडले. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे लोक काय करू शकतील, याचा अंदाज मला आहे. मी ज्योतिषी म्हणून हे अंदाज वर्तवत नाही. असेही राज ठाकरे  यावेळी म्हणाले.

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारला  एकही आश्वासन पाळता आलेले नाही. रोजगाराच्या संधी,  शेतकऱ्यांना मदत, गरीबांना शिक्षण, या सर्व पातळ्यांवर या सरकाराला  अपयश आले आहे. त्यामुळे जवानांची मदत घेऊन सरकार निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.